मुळशी तालुक्यात सध्या भात लागवड सुरू असून यासाठी मजूर म्हणून कातकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या कामासाठी एका दिवसाचा रोजगार म्हणून महिलेला 250 /- रू. तर पुरूषाला 300/- रू.दररोजच्या दररोज रोख मिळतात. परंतु तरूण पणापासूनच व्यसनाच्या हारी गेलेल्या या मंडळींकडून मिळालेले पैसे घरापर्यत जातीलच की नाही याची खात्री नसते. पाच- सहा मुलांचे आई- बाप असलेली ही नवरा बायकोची जोडी कामावरून सुटल्यावर थेट कंजारभटाच्या दारूच्या गुत्त्यावर जावून हाती आलेला पैसा खर्च करून रिकाम्या हाती घरी येतात . त्यावेळी त्यांची मूल- बाळं आपलीआई आणि बाप आपल्यासाठी येताना नििश्चतच काही ना काही खायला घेऊन येणार या आशेने वाटेकडे टक लावून बसलेली दिसतात. हातभट्टी पिऊन शुद्ध हरपलेल्या या आई बाबांना ना आपल्या मुलाच्या पोटाची चिंता असते ना कुटुबांच्या उद्याच्या भविष्याची. आजचा आपला दिवस मौजेत गेला बस !
नितीनजी घोडकेनी सुचवल्याप्रमाणे मुद्दाम मी आज या पाड्यावर तेथील लोकांना भेटण्यासाठी गेलो होतो. मंगळवारच्या मोडयाचा दिवस ( या भागात मंगळवारी शेतीच्या कामाला सुट्टी असते त्याला मोडा असं म्हणतात) असल्याने बहुतांशी कातकरी मंडळी आपआपल्या छपरात बसलेली होती. त्यातील बरेचजन कामाला सुटटी असूनही सकाळपासूनच पिऊन तरर् होते. या परिस्थितून या लोकांना बाहेर कसे काढावे हा खर तर खूप गंभीर प्रश्न आहे. तरीही सचीन आकरे या आपल्या कार्यकर्त्याला जो त्या वस्तीसाठी दररोज काही ना काही काम करतो, त्याला सांगून सर्व महिला ,पुरूष व लहान मुलांना नवीन सभागृहात एकत्र करण्यास सांगितले. त्यावेळी ते करीत असलेल्या व्यसनाबाबतीत त्यांच्याशी बोलत असताना एक सगळ्यांचा एकच सूर होता ‘ काय करावं गुरूजी , आमाला पिल्याबगर कामच व्हत नाय , त्यामुळं ठरीवलं तरी ही दारू बंद व्हणं अवघड हाय ……
गुरूजी, काय बी करा आमच्या सोह-याला ( मुलाला ) मातर चांगलं शिकवा . त्यांच्या बोलण्याची हीच नस पकडत त्या सर्वानी मुलांसाठी काही ना काही बचत करावी असं आवाहन त्यांना केल्यावर यासाठी सर्वानी एकमुखाने होकार दिला. भातलागवडीचा हंगाम पूर्ण होईपर्यत प्रत्येक घरातील पुरूषाने 100 रू . व महिलेने 100 रू अशी दैनिक ठेव जमा करावी असे ठरले. आपल्याला आश्चर्य वाटेल यामध्ये त्याच ठिकाणी प्रत्येक घरातील व्यक्तीने नाव नोंदवून आपले सदस्यत्व नक्की केले. त्यांच्या या ठेव योजनेला त्यांनीच नावे नक्की करून पुरूषाच्या गटाला ‘ जय बजरंग’ व महिलांच्या गटाला ‘भारत माता महिला ठेव योजना ‘ ही नावे निश्चित करण्यात आली. 25 पुरूषांपैकी 10 जणांनी व 25 महिलांपैकी 13 जणींनी 100 रू.प्रमाणे दै. बचतीसाठी बसल्याजागी पैसे जमाही केले. या 50 लोकांनी नियमित पैसे भरले तर 30 दिवसांच्या भात हंगामाची यांची बचत होणार आहे 1.5 लाख रूपये. पुढील 11 महिन्यात दरमहा फक्त 100 जरी भरले तरी 55 हजार जमा होतील . जमा होणा-या एकूण बचतीची 2 लाख 5 हजार रूपयांची रक्कम पोस्टात जमा करून ती रक्कम या लोकांना त्यांच्या गरजेकरिता त्यांच्यातल्या त्यांच्यात 1% व्याज दराने देता येणार आहे. या दैनिक बचत ठेव योजनेच्या कल्पनेचा आज शुभारंभही झाला याचा विशेष आनंद होत आहे. या आर्थिक परिवर्तनातून या कातकरी बांधवाचे निश्चितच मन:परिवर्तन होईल अशी आशा आहे!



